श्लोक ९/३: स्वधर्माबद्दल प्रेम हवे

जानेवारी 16, 2012

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

 यज्ञार्थात्कर्मणोन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः ।

तदर्थं कर्म कौंतेय मुक्‍तसंगः समाचर ॥ गीता ९:३ ॥

कुरुक्षेत्रामधून युद्ध न करता निघून जायचा जो निर्णय अर्जुनाने घेतला होता, त्यामागील हेतूंची फोड करताना भगवान श्रीकृष्णांनी कर्म न करण्याने समोरील कर्मांपासून सुटका होईल अशी अपेक्षा धरणे किती फोल आहे हे स्पष्ट करुन सांगितले. मनात वासना जागृत असल्या तर बाह्यकर्मांच्या त्यागाने दांभिकतेशिवाय काही हस्तगत होत नाही असा उपदेश निसंदेहपणे त्यांनी केला. त्यानंतर ते म्हणाले की कर्मांनी असा काय दोष केला आहे की तू त्यांचा स्वीकार करण्यास तयार नाहीस? तुझ्या मनातील संदेहाचे कारण समोरील कर्म नसून मनातील (आत्तापर्यंत सुप्त असलेल्या) मोहाची जाळी आहेत. स्वकीयांबरोबर युद्ध करण्याच्या निमित्ताने तुझ्यात दडून बसलेल्या भावना समोर आल्या आहेत आणि त्यांना तोंड द्यायच्या ऐवजी तू निरोप्याला (म्हणजे युद्धकर्माला) शिक्षा करीत आहेस हे लक्षात घे. जर कर्म करायचेच नसेल तर स्वदेहाचे पालन करण्याची कर्मेसुद्धा तुला सोडायला हवीत आणि त्याला तुझी तयारी दिसत नाही! स्वधर्मानुसार करावयास लागणारी कर्मे समोर आली तर ती निष्ठेने पार पाडणे हे सर्वभूतांचे कर्तव्यच आहे, त्याला पर्याय नाही. आणि निव्वळ कर्मांमुळे कुणीही जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये गुरफटत नाही हे ध्यानात ठेव. कर्मे करीत असताना आपली प्रवृत्ती काय आहे यावर आपण मुक्त आहोत की नाही हे ठरते. वरील श्लोकातून स्वधर्म करीत असताना आपली वृत्ती कशी असावी याचे स्पष्टीकरण देताना श्रीकृष्ण म्हणत आहेत की ‘अरे अर्जुना, यज्ञ करीत असताना आपली जी मनोवृत्ती असते ती सतत जागृत ठेवून समोरील कर्मे कर. बाकी कुठलीही वृत्ती ठेवलीस तर कर्मे बंधनात पाडतील. थोडक्यात सांगायचे झाले तर कुठल्यातरी मोहाला बळी न पडता मोकळ्या मनाने कर्मे केलीस तर तू मोक्षाला पात्र होशील (९).’

मराठीत एक म्हण आहे: नाचता येईना, अंगण वाकडे. याचा अर्थ असा की स्वतःची कमतरता झाकण्यासाठी आपण कुठलीही सबब द्यायला तयार असतो. कर्मांच्या बाबतीत आपली मनःस्थिती अगदी अशीच असते. कर्मफलाच्या आशेने आपण बंधनात पडतो असे ऐकले की आपण मग कर्मे न करणेच संयुक्तिक आहे असा निष्कर्ष काढतो पण ‘मी फलापेक्षा सोडून कर्मे करीत राहीन’ असे म्हणत नाही. खरे म्हणजे असे म्हणणेच संयुक्तिक आहे. ‘कर्म करणेच थांबवावे’ असे म्हणण्यामागे आपल्या मनात अशी भावना असते की ‘आपण पडलो एक सामान्य माणूस. आपल्याला फलापेक्षा न ठेवता कर्म करणे कसे जमणार? त्यापेक्षा कर्मे न केलेलीच बरी.’ परंतु हा विचार वस्तुस्थितीला धरुन नाही. याचे पहिले कारण म्हणजे वरील विचारसरणीत ‘कर्म न करण्याचा निर्णय घेणे’ हे कर्म आपण केलेले आहे इकडे आपण लक्ष दिलेले नाही. आणि हे “कर्म न करण्याचे कर्म” आपण ‘कर्मबंधनात अडकू नये’ या अपेक्षेने (म्हणजे फलाकडे लक्ष ठेवून!) केलेले असल्याने अधिकच धोकादायक आहे हे आपण बघत नाही. तेव्हा कर्मांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही हे स्पष्टच आहे.

परंतु आपली दुसरी आणि सर्वात मोठी चूक म्हणजे स्वतःच्या क्षमतेबद्दल शंका घेणे ही होय. लक्षात घ्या की या जगातील भौतिकदृष्टीने सर्वात कनिष्ठ स्थितीतील माणूस आणि सर्वांवर वरचढ असणारा मनुष्य या दोघांमध्ये कर्मफलांकडे लक्ष न देता कर्मे करण्याची क्षमता आहे. म्हणूनच सर्व संत असे म्हणतात की या जगात सर्वांना भगवंताकडे जायची मुभा आहे. वरकरणी पाहता निरपेक्षपणे कर्म करणे कितीही अवघड वाटले तरी सखोलपणे पाहील्यास आपण सर्वजण ते करु शकतो. हा सिद्धांत सिद्ध करण्यासाठी आपल्या सर्वांमध्ये असलेला एक विश्वास पाहू. तो म्हणजे या जगातील सर्वांना ‘आपण प्रेम करु शकतो’ याबद्दल असलेली खात्री. कदाचित आपणास प्रेम करण्यास योग्य अशी व्यक्‍ती वा तत्व मिळाले नसल्याने आपल्यातील प्रेमाला दृष्यरुप मिळाले नसेल पण इथे मुद्दा आपल्यातील स्वयंभू शक्तीचा आहे. त्या शक्तीचे बाह्यजगात दृष्यरुप दिसते का नाही याचा इथे संबंध नाही. वाचकांनी जरा अंतर्मुख होऊन बघितले तर त्यांना अशी खात्री होईल की योग्य संधी मिळाल्यास प्रेम करणे आपणास सहज शक्य आहे. आणि ज्याला प्रेम करणे जमते त्याला निरपेक्षपणे कर्म करणे जमायलाच हवे कारण प्रेमात याशिवाय दुसरे आहे तरी काय?! ज्या व्यक्‍तीच्या प्रेमात आपण गुंतलेलो आहोत तीच्याकरीता सर्वस्वाचा त्याग करण्याची आपली तयारी नसते काय? कुठल्याही लाभाची अपेक्षा न ठेवता आपण आपल्या प्रेमाकरीता कष्ट करायची तयारी ठेवतो आणि त्याचवेळी असेसुद्धा म्हणतो की कर्मफलाच्या अपेक्षेशिवाय कर्मे करणे मला शक्यच नाही!

आपण असे म्हटले पाहीजे की स्वधर्माबद्दल माझ्या मनात प्रेम नाही म्हणून मला ती करणे जमत नाही. प्रेम कुणावर आणि कशावर करावे हे आपणास माहित नाही असे आपण कबूल केले तर योग्य शिक्षकाकडे जाऊन माहिती करुन घेणे हा आपल्या संकटावरील उपाय सहज नजरेसमोर येईल. याउलट मला जमणारच नाही असे म्हटले की पुढील सर्व संभाषणच संपते! अर्जुनाला क्षत्रियधर्माबद्दल प्रेम असते तर त्या प्रेमाकरीता त्याने आपल्या सर्व स्वकीयांचा नाश आनंदाने केला असता. स्वधर्म यज्ञाप्रमाणे करणे म्हणजे निव्वळ स्वधर्माकरीता स्वधर्म करणे होय. असे करण्यासाठी प्रेमाशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि समोरील कर्मांकडे प्रेमाने पहावयाचे असेल तर त्यांच्यामागे प्रत्यक्ष भगवंताचा हात आहे असा विश्वास आपण जागृत ठेवायला हवा. हा विश्वास उत्पन्न होण्यास संतसाहीत्य आणि संतचरीत्र यांचा डोळस अभ्यास आपण करायला हवा. ‘माझ्यात क्षमता नाही’ हे रडगाणे थांबवून प्रत्यक्ष कृती करायला हवी. हे ज्यांना जमले त्यांना सर्व साधले.

॥ हरिः ॐ ॥


Follow

Get every new post delivered to your Inbox.