॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्गुरु माधवनाथाय नमः ॥
आणि येर तेही पांडवा । जे आरुढोनि सोऽहंभावा ।
झोंबती निरवयवा । अक्षरासी ॥ ४०:१२ ॥
मनाची नखी न लगे । जेथ बुध्दीची दृष्टी न रिगे ।
इंद्रिया कीर जोगे । काई होईल? ॥ ४१:१२ ॥
आपुलिया साटोवाटी । शून्य घेती उठाउठी ।
तेही मातेचि किरीटी । पावती गा ॥ ५८:१२ ॥
वांचूनि योगाचेनि बळे । अधिक काही मिळे ।
ऐसे नाही आगळे । कष्टचि तया ॥ ५९ :१२ ॥
भगवद्गीतेतील बाराव्या अध्यायात भगवंतांनी भक्तीयोगाचे वर्णन केले आहे. या अध्यायाची सुरुवात भक्तशिरोमणी अर्जुनाच्या प्रश्नाने होते. अकराव्या अध्यायात भगवंताच्या विश्वरुपाचे दर्शन झाल्यावर त्याच्या मनात भय निर्माण झाले व त्यामुळे त्याने श्रीकृष्णांची विनवणी भगवंताचे सगुण रुप मागून घेतले होते. स्वतःच्या सगुण रुपाट परत जाण्याआधी भगवंतांनी त्याला उपदेश केला होता की हे विश्वरुपच माझे स्वरुप आहे, खरे रुप आहे. आणि त्यात विलिन होण्यातच खरा आनंद आहे, साधनेचे अंतिम ध्येय आहे हे तू विसरु नकोस. त्यांच्या वक्तव्यामुळे आता बाराव्या अध्यायात अर्जुन असे विचारतो की काही साधक (योगमार्गाने) तुझे अव्यक्त, निर्गुण निराकार रुप उपासत आहेत तर काही भक्त तुझ्या सगुण रुपावर निरंतर प्रेम करीत आहेत. या दोघांमध्ये कुणाला तुझी खरी प्राप्ती होईल? अर्जुनाचा हा मार्मिक प्रश्न ऐकून भगवंत प्रसन्न होतात आणि त्याला सांगतात की या दोघांना एकसारखीच प्राप्ती होईल. ज्ञानेश्वर माऊलींनी अध्यायाच्या चाळीसाव्या ओवीपासून सत्तावन्नाव्या ओवीपर्यंत निर्गुण रुप आपल्या मन-बुध्दी संकुलाच्या पलिकडे कसे आहे ते वर्णन केले आहे. अशा रुपाची प्राप्ती करण्यास केव्हढे कष्ट साधकाला करावे लागत असतील याची आपण कल्पना करु शकतो. परंतु शेवटी त्यांच्या मार्गाचा अंतसुध्दा भगवंतामध्ये विलीन होण्यातच होतो. भगवान म्हणत आहेत `अरे अर्जुना, जे `सोऽहं’ भावात दिवसरात्र गुंग राहून माझ्या अव्यय, निर्गुण रुपाच्या प्राप्तीची आस धरुन असतात. ज्या रुपाचे वर्णन करण्यास मनाला कुठे सुरुवात करावी हे कळत नाही, ज्या ठिकाणी आपली मति पोहोचू शकत नाही अशा रुपाचे ज्ञान इंद्रियांनी भोगता येईल हे शक्य आहे का? अगदी ध्यानातसुध्दा जे रुप गोचर होत नाही त्या शून्यरुपाला आपल्या शक्तीप्रमाणे कवटाळायचा प्रयत्न करणारेही साधकही शेवटी (भक्तांप्रमाणेच) माझ्यातच विलिन होतात. त्यांच्या योगशक्तीच्या बळाने त्यांना भक्तांपेक्षा अधिक काही मिळते असे नाही, याउलट त्यांच्या मार्गात अतोनात कष्टच (भक्तीमार्गापेक्षा) जास्त असतात.’
बघू नका फरक मार्गांत । भावना पहा साधकाच्या ह्रुदयात ।
मनातील भेद मग मावळतात । सुमती सहिष्णुतेची उद्भवेल जीवनात ॥
भक्तिमार्ग, योगमार्ग, ज्ञानमार्ग इत्यादी शब्द आपल्या कानावर पडतात तेव्हा कुठली भावना निर्माण होते? आपण कुठल्या मार्गावर आहोत याचे कुतुहल निर्माण होते की नाही? आणि एकदा आपण मनाशी ठरविले की माझा साधनेचा मार्ग अमुक-अमुक आहे की मग त्या जाणविलेल्या मार्गावर चालण्याचे बंधनच जणू आपल्याला होते. `अरे, मी नामस्मरण करणारा भक्त आहे. मग माझ्या मनात देवाच्या अस्तित्वाबद्दल शंका यायला नको.’ असे वाटायला लागते की नाही? मग आपल्या जीवनात अचानक गोष्टी बिघडायला लागतात, जवळच्या नातेवाईकांचे आजार बघायला लागतात तेव्हा देव असे का करीत असेल असे विचार जेव्हा मनात येतात तेव्हा काय होते? स्वतःवर आलेल्या साधारण आपत्तिने माझा विश्वास कसा ढळला याची खंत मनात निर्माण होते. आधीच एकतर आयुष्यात समोर आलेल्या आपत्तीला तोंड देताना आपली फरफट होत असते त्यातच आपल्या साधकत्वाबद्दल शंका निर्माण झाली की व्यावहारिक आणि पारमार्थिक या दोन्ही बाजूंनी आपली अवस्था भीषण वाटायला लागते. याउलट मी ज्ञानमार्गाने चालणारा साधक आहे अशी समजुत झाली असेल तर देवाच्या मूर्तीबद्दल अचानक प्रेम उफाळून येते तेव्हा ते नैसर्गिक प्रेम व्यक्त करावयास लाज वाटते. देवाच्या नावाचा मोठा गजर होत असतो तेव्हा आपले हात छातीवर ठेवून आपण जोडत नाही तर हळूच चोरुन पायावर त्यांना एकत्र आणतो व भजन तोंडाने न म्हणता कुणाचे उच्चार कसे आहेत याकडे लक्ष द्यायला लागतो! स्वतःच्या बौध्दीक वृत्तीला काळे लागणार नाही अशी खात्री करुनच आपण नमस्कार करतो. या सर्व गोष्टींचे कारण म्हणजे आपण स्वतःला एका साच्यात घालून भगवंताकडे जायचा प्रयत्न करीत असतो. आपली मन आणि बुध्दी एवढी साफ नसते की एका भावनेमध्ये आपण निरंतर राहू शकू. परंतु एकाच मार्गावर चालण्याचे बंधन स्वतःवर लादून आपण मनाकडून एकाग्रतेची मागणी करीत असतो. हा विसंवाद आपल्या दुःखाचे मूळ आहे.
खरी गोष्ट अशी आहे की प्रत्येक साधकाला जीवनात सगळेच मार्ग चालावे लागतात. कधी तुम्ही एखाद्या भक्ताप्रमाणे व्यवहार कराल तर कधी तत्वज्ञानाच्या चर्चेत हिरीरीने भाग घेऊन देवाबद्दल चिंतन कराल. तर कधी त्याच्या अस्तित्वाबद्दल शंका घेऊन जीवनात व्यावहारिक प्रगतीच खरी आहे असा स्वतःचा समज करुन घ्याल. ह्या सर्व मनाच्या अवस्था आहेत. त्यातील कुठल्याही घटनेत तथ्य नाही हे जाणून जो स्वतः स्वस्थ असतो त्याला अध्यात्मिक प्रगती फार झटकन प्राप्त होते. असे बघा, केवलाद्वैताचे थोर प्रचारक जगद्गुरु आदी शंकराचार्यांनी सुध्दा देवीवर स्तोत्रे लिहिली आहेत मग आपल्यासारख्या जीवांची गोष्टच करायला नको. भगवान श्री रमण महर्षींकडे कुणी देवीचा प्रसाद घेऊन आला की ते अत्यंत आदराने त्याचे सेवन करुन बाकी भक्तांना वाटायचे. त्यात त्यांच्या अमूर्त साधनेला धोका आला असे ते कधीही मानायचे नाहीत. त्याचप्रमाणे नामस्मरणाचा उपदेश आयुष्यभर केलेल्या श्रीसंत श्री गोंदवलेकर महाराजांची `प्रवचने’ जे वाचतील त्यांना त्यातील अद्वैत तत्वज्ञान जरुर जाणवेल. स्वतःच्या जीवनाकडे तटस्थपणे बघा हा सल्ला वारंवार ऐकायला मिळेल. अशी अनंत उदाहरणे आपणास सांगत आहेत की साधनेमध्ये स्वतःला एकाच मार्गावर चालत ठेवण्याचे बंधन घालणे साधकाला हितावह नाही.
असे मार्ग बदलण्यात काही धोका नाही असे कसे? व्यवहारात आपण पहातो की बंगलोरहून कोल्हापूरला जायला आपण एकच रस्ता घेतो. मध्येच सोलापूरचा फाटा आला तरी तो सोडून आपण एकाच मार्गावर रहातो. मग साधनेत का म्हणून मार्ग बदलायची तयारी ठेवावी? याचे कारण असे की व्यावहारिक मार्ग आपणास वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात असतात. परंतु अध्यात्मामध्ये कुठल्याही मार्गाने जरी तुम्ही चाललात तरी अंतिम स्थळ एकच आहे. त्यामुळे तुम्हाला जो मार्ग ज्याक्षणी आवडेल तो तुम्ही अवलंबू शकता. एकाच ठिकाणी तुम्ही पोहोचाल याची खात्री आहे. आज निरुपणाला घेतलेल्या वरील ओव्यांमध्ये श्री ज्ञानेश्वर महाराज हेच सांगत आहेत. साधकाचे काम भोज्याला हात लावायचे आहे. त्याला अडवायला प्रकृती निरनिराळे मोह दाखवून फसवित आहे. त्या सर्व अडथळ्यांवर कुठल्याही मार्गाने, कुठल्याही उपायाने मात करुन अंगात विवेक आणि वैराग्य बाणवायचे आहे. बस इतकेच! मग यापुढे सर्व मार्ग एक होतात. मग तुम्ही त्याला भक्ती म्हणा वा ज्ञान म्हणा. एकदा अंगात प्रखर वैराग्य भिनले की साधक जे काही वर्तन करतो ते सर्व त्याची साधना म्हणून सिध्द होते. त्याच्या मूळ, नैसर्गिक स्वभावानुसार त्याचे वर्तन मुख्यत्वा भक्तीरुप असेल किंवा ज्ञानाच्या प्रखर तेजाने उजळून निघाले असेल. अशा साधकाच्या बाह्य वर्तनाला महत्व देण्यात आपण त्यामागील असलेल्या वैराग्यरुपी जिवंत धगीला दुर्लक्षित करीत आहोत हे लक्षात घ्या. आपल्यासमोर भाग्यवशाने आलेल्या खऱ्या साधकाच्या बाह्य वर्तनाची नक्कल करणे सोपे असते. परंतु त्या नकलेमध्ये आपण मूळ मुद्दा विसरत तर नाही ना याकडे ध्यान देणे जरुरी आहे. सर्व संतांच्या जीवनाकडे डोळे उघडे ठेवून बघितले तर काय दिसेल? संसाराबद्दलची असीम विरक्ती. मग त्याचे दृष्य रुप म्हणून कुणी देवाचे नाम घेत रस्त्यावर फिरत असेल तर कुणी बोधीवृक्षाखाली बसून ध्यान करीत असेल तर कुणी लग्नाच्या बोहल्यावरुन पळून जाऊन एका पायावर उभा राहून तपश्चर्या करीत असेल. प्रत्येकाचे मार्ग भिन्न असतील परंतु त्या सर्व मार्गांवर पदयात्रा करण्यास प्रवृत्त करणारी शक्ती एकच आहे. ती म्हणजे व्यावहारिक जगाबद्दलचे वैराग्य. एकाच शक्तीची ही विभिन्न रुपे आहेत हे ध्यानात आले की मार्गांमधील भेदभाव नष्ट व्हायला लागतो. एकाच कुटुंबातील मुले वेगवेगळ्या स्वभावाची असतात परंतु आपण त्यांना भाऊ आहेत असे म्हणताना फारसा विचार करीत नाही. तशी ही गोष्ट आहे. सर्व मार्ग एकाच भगवंताच्या शक्तीची रुपे आहेत. भले एक काळे एक गोरे असेल पण त्यांच्यात एकमेकांबद्दल प्रेम आहेच ना. मग त्यांच्या मागे मागे जाण्याऱ्या साधकांमध्ये का वैमनस्य असावे?!! श्री रामकृष्ण परमहंस म्हणायचे की एकदा श्रीराम आणि श्रीशंकर यांच्यात युध्द झाले. त्यांनंतर दोघेही ही गोष्ट विसरुन जवळ आले पण त्यांचे अनुयायी अजून एकमेकांविरुध्द आहेत! परम योगी श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबेस्वामी) महाराजांच्या परिव्राजक भ्रमणात ते वैष्णवांच्या गावात गेले की भोजनसुध्दा मिळायचे नाही. कधी कधी एक महिनाभर भोजन न मिळालेले त्यांनी सहन केले होते! केवळ वैष्णव नाहीत म्हणून ही अवहेलना. साधनेच्या फक्त आपल्याच मार्गावर प्रेम करायची ही पराकोटी झाली. मान्य आहे की आपण इतके एकांगी नसू. पण जरा बघा की आपल्यात स्वतःच्या मार्गाचा अभिमान आहे कि नाही ते. माझे गुरु श्रेष्ठ कसे याचा उहापोह तुम्ही करता का? करीत असाल तर स्वतःच्या मार्गाचा गर्व तुम्हाला आहे. (अर्थात म्हणून आपल्या मार्गाची अवहेलना सहन करावी असे नाही हे ध्यानात घ्या.) कुठलाही अहंकार तुम्हाला भगवंतापासून दूर नेतो हे निर्विवाद सत्य आहे. अगदी स्वतःच्या साधनेचा अभिमानसुध्दा. प्रत्येक साधक एकाच वैराग्यशक्तीचा आधार घेऊन मार्गक्रमणा करीत आहे हे लक्षात आले की आपली दृष्टी बदलते. वरील ओवींतून हा एक अर्थ आज दृष्टोपत्त्यास पडत आहे.
आता इथे साधना हा शब्द आपण वापरतो त्याचा खरा अर्थ काय आहे यावरसुध्दा विचार करावासा वाटतो. तुमच्यापैकी कुणी म्हणेल माझी साधना सकाळी ब्राह्ममुहुर्तावर उठून ध्यान करण्याची आहे तर कुणी म्हणेल मी दिवसात अमुक संख्या नामस्मरण करतो. अशा गोष्टींतून साधना प्रगट होते हे निश्चित आहे परंतु हे साधनेचे केवळ एक अंग आहे हे बहुतांशी लोकांना जाणवते असे दिसत नाही. साधना म्हणून जर ह्या क्रियाच असतील तर आयुष्यातल्या बाकीच्या समयाचे काय? सकाळी तास, दोन तास ध्यान करुन झाले की तुम्ही वाटेल तसे वागायला मोकळे होता का? तुमच्या दैनंदिन वागण्यात साधना नसते का? साधनेचे दोन प्रकार आहेत असे वाटते. एक म्हणजे ध्यान करणे, नामस्मरण करणे हा. तो बहुतांशी साधकांचा एक असतो. आणि दुसरा जो आहे तो प्रत्येक साधकाचा खास स्वतःचा असतो. एक उदाहरण द्यायचे झाले तर असे की आपण सगळेच पेट्रोल पंपावर जाऊन आपल्या वाहनात इंधन भरतो. ही क्रिया सर्वांना समान आहे. त्याचप्रमाणे सर्वजण देवाचे नाम घेतील वा ध्यान करतील. पण इंधन भरल्यावर वाहनाचा उपयोग कोण कशाकरीता करतो हे भिन्न असते. कुणी त्या वाहनाने अडलेल्या मदत करतील तर कुणी बँकेतून पैसे काढतील तर कुणी दुसऱ्यांना फसवायला उपयोग करतील. त्याचप्रमाणे नामस्मरण झाल्यानंतर वा ध्यान केल्यानंतर आपल्या जीवनात जी शक्ती येते तीचा वापर आपण कसा करतो हे प्रत्येक साधकाला स्वतःच ठरवायचे असते. साधनेतील भक्तीमार्ग, ज्ञानमार्ग हे प्रकार म्हणजे आपण कुठल्या पेट्रोल पंपावर जाऊन आपण इंधन भरतो हे सांगण्यासारखे आहे. परंतु मूळ मुद्दा इंधन भरण्याचा नाही. आपण वाहन विकत घेतो ते कुठेतरी जाण्याकरीता, निव्वळ इंधन भरण्याकरीता नाही! त्याचप्रमाणे आपली `साधना’ आपणास कुठे घेऊन जात आहे याचे ध्यान जो ठेवतो तो खरा साधक. उदाहरणार्थ, श्रीगुरुंच्या जवळ जाणे, त्यांच्या मनात आपल्याबद्दलची आत्मियता निर्माण करणे हे चांगले खरे पण त्यानंतर स्वतःच्या उद्योगधंद्याबद्दल त्यांना प्रश्न विचारणार का अध्यात्मिक प्रगतीबद्दल सल्ला घेणार? तुम्हाला कुठे जायचे आहे हे तुम्हालाच ठरवायचे आहे. सगळी साधना करुन ऐहीक प्रगतीच हवी असेल तर कशाला हवा आपल्या मार्गाबद्दल अभिमान? आणि साधनेचे ध्येय भगवंताची प्राप्ती असेल तर जोपर्यंत त्याची पाप्ती होत नाही तोपर्यंत कशाला हवा आपल्या साधनेबद्दल अहंकार?
तुम्ही कुठल्याही नजरेने पहा. आपल्या मार्गाबद्दल अहंगंड ठेवणे सर्वस्वी चुकीचे दिसून येईल. दुसऱ्याचा मार्ग कुठला हे बघायचीसुध्दा आवश्यकता नाही, मग त्यावर मत दर्शविणे दूरच राहिले. खरा परमार्थ कुठल्याही मार्गाने साधता येतो कारण परमार्थाचे ध्येय स्वतःमध्येच दडलेले आहे. हा एकट्याने स्वतःशी खेळायचा डाव आहे. मग बाकीच्यांकडे लक्ष कशाला. एकलव्याने गुरुंची मूर्ती समोर ठेवून, ते आपल्याला शिकवित आहेत या केवळ विश्वासावर आपले ध्येय गाठले हे लक्षात घ्या. सहिष्णुता म्हणजे काय तर या जगातील यच्चयावत जीवांकडे सहनुभूतीने पहाणे. ही अंगात बाणवायला सर्वांचे अंतिम ध्येय एकच आहे हे सतत ध्यानात ठेवा. आपण सर्व एकाच शक्तीची मुले आहोत. आपल्या भाऊ-बहिणींबरोबर वाद घालण्यात कशाला वेळ वाया घालवायचा?
॥ हरि ॐ ॥
(बंगलोर, दिनांक १८ मे २००८.)