॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्गुरु माधवनाथाय नमः ॥
श्रीभगवानुवाच –
लोकेऽस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मयाऽनघ ।
ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनाम् ॥ गीता ३:३ ॥
गीतेच्या तॄतीय अध्यायाची सुरुवात अर्जुनाच्या मनातील शंकेने होते हे आपण गेल्या वेळी बघितले. भगवंतांच्या सांगण्याकडे त्याने आपल्या पूर्वग्रहदूषित नजरेने बघितल्याने त्याच्या मनात भगवान श्रीकृष्णांच्या वक्तव्याने संदेह निर्माण झाला होता. परंतु मनातील श्रीकृष्णांबद्दल असलेल्या पराकोटीच्या आदराने तो अत्यंत संभ्रमित अवस्थेतही असे म्हणाला की ‘तुम्हीच आता असा उपदेश करा की त्यायोगे मी नक्की कसे वागायला हवे हे मला सुनिश्चितपणे कळेल.’ द्वितीय अध्यायाच्या सुरुवातीला केला होता तसा आपलेच म्हणणे खरे आहे हे सिद्ध करण्याचा अट्टाहास अर्जुनाने इथे केलेला नाही हे आपण लक्षात घ्यायला हवे. त्याच्या अध्यात्मिक प्रगतीचे हे एक लक्षण आहे. संतांची वक्तव्ये आपल्यासारख्यांना पूर्णपणे कळणे शक्य नाही, पण म्हणून निराश न होता वा त्यांच्याशी वादविवाद न करीता आपण अर्जुनाप्रमाणेच त्यांना अशी विनवणी केली पाहिजे की तुम्हीच तुमचा सल्ला मला कळेल अशी कृपा करा! असो. अर्जुनानी योग्य मनोभूमिका ठेवून विचारलेल्या प्रश्नावर भगवान त्याला परत एकदा समजाऊन सांगायला लागले: ‘मी तुला आधीच युद्ध कर असे सांगितलेले आहे. परंतु युद्ध करण्याच्या क्रियेचा हेतू निव्वळ हस्तिनापुराचे राज्य प्राप्त होईल एवढा संकुचित ठेऊ नकोस हे स्पष्ट करण्याकरीता मी तुला जीवनाच्या अंतिम ध्येयाचेसुद्धा दर्शन घडवून दिले. “अरे अर्जुना दोन तऱ्हेच्या निष्ठांबद्दल मी तुला आधीच सांगितला आहेत. बुद्धीने या जगातील चोवीस तत्वांना आधार असलेले पंचविसावे तत्व म्हणजे मी अशी प्रज्ञावंतांची निष्ठा असते (सांख्ययोग) तर ज्यांना व्यावहारीक कर्मांमध्ये रस आहे त्यांच्याकरीता कर्मयोगरुपी निष्ठाच असते (आणि त्यांनी तशीच भक्ति करणे योग्य आहे) (३)”.’
ज्याप्रमाणे आपण अर्जुनाकडे साधकांचे रुपक म्हणून बघू शकतो त्याचप्रमाणे गीतेमधील श्रीकृष्ण हे सद्गुरुंचे अतिशय समर्पक रुपक आहे असे वाटते. सबंध गीतेमध्ये त्यांच्या मनातील अर्जुनाच्या पारमार्थिक प्रगतीबद्दलचा कळवळा आणि त्याच्या मनातील मोहाने उत्पन्न झालेल्या भावनांच्या आंदोलनांबद्दलची कठोर उपेक्षा सतत दिसून येते. युद्ध केल्याने तुझ्या कुळाला अखंड ऐश्वर्य प्रप्त होईल आणि आपल्याच नातेवाईकांची हत्या केल्याचे जे काही पाप असेल ते मी माझ्या डोक्यावर घेईन असे सांगून अर्जुनास युद्धास उद्युक्त करणे त्यांना सहज शक्य होते. परंतु हा सोपा मार्ग न निवडता त्यांनी अर्जुनाच्या मनातील मोहाला नष्ट करणे योग्य समजले यातून त्यांचा परमकृपाळू स्वभाव दिसून येतो. ज्याप्रमाणे उदार दात्याची परीक्षा त्याने किती मूल्यवान वस्तू दान दिली यावरुन होतो त्याचप्रमाणे कृपाळूपणाचा सर्वोच्च निकष म्हणजे समोरील मानवाच्या जीवनातून सर्व दुःखांचे मूळ म्हणजे मोह याचा नाश करणे हा होय. आपले सद्गुरुसुद्धा निरंतर याच प्रयत्नात असतात.
आपले मन एखाद्या अतिशय हट्टी मुलाप्रमाणे असते. अशा मुलाच्या दैनंदिन जीवनात जोपर्यंत एखादी इच्छा निर्माण होत नाही तोपर्यंत तो अगदी आदर्श मुलासारखाच वागतो. त्याच्या मनात पालकांबद्दल आदरही असतो. परंतु कुठल्यातरी इच्छेने त्याच्या मनात ठाण मांडले की त्याचे स्वरुप एकदम बदलते. मग आपल्या हट्टाने जगामध्ये कितीही उलथापालट झाली तरी आपले म्हणणे तो सोडत नाही. कुठलीही समजुत वा तडजोड त्याला मान्य होत नाही. त्याच्या आकांडतांडवाकडे संपूर्ण दुर्लक्ष करणे किंवा त्याच्या मागणीला पूर्ण करणे हे दोनच उपाय आपल्यासमोर असतात. या वर्तनामध्ये आणि मनाच्या वागण्यात किती साम्य आहे ते बघा. बहुतांशी वेळा, विशेषतः सद्गुरुंच्या सान्निध्यात (त्यांच्या प्रभावाने) आपले मन अगदी मवाळ होऊन स्वतःच्या सर्व मागण्या सोडून देऊन आदर्श मुलाप्रमाणे वागते. आणि मनाचे खेळ थांबल्यामुळे सद्गुरुंची सर्व वक्तव्ये आपणास हस्तगत होतील असे आपणास वाटू लागते. कारण पारमार्थिक ध्येय प्राप्त न होण्यास केवळ मानसिक भावनांचे खेळच कारणीभूत असतात, माउलींनी म्हटलेले आहेच की: ‘तैसे मन हे मुद्दल जाये । मग अहंभावादिक कें आहे । म्हणोनि शरीरेंचि ब्रह्म होये । अनुभवी तो ॥ १५७:५ ॥’ त्यामुळे सद्गुरुंनी ‘दररोज ठराविक वेळ श्रीज्ञानेश्वरी वाच’ असे म्हटले की लगेच ‘हो वाचीन की!’ असे उत्तर देतो आणि ‘सकाळी लवकर उठून ध्यान कर’ असे ऐकल्यावर ‘हो जर मी दररोज साडेसहाऐवजी सहाला उठीन आणि निश्चितपणे अर्धातास ध्यान करीन’ असे म्हणतो. आणि ‘व्यावहारीक प्रगती सहजपणे जेव्हढी होईल तेव्हढीच होऊ दे. उगाच जीवाचा आटापिटा करु नकोस’ या उच्चारांना निःसंदेह मान्यता देतो! परंतु जेव्हा गुरुगृहातून आपल्या घरी परत येतो आणि नेहमीच्या वेळेला चहा मिळत नाही तेव्हा मनामध्ये चहा पिण्याची आत्यंतिक इच्छा निर्माण होऊन आपला संताप आवरेनासा होतो आणि काही वेळापूर्वी मान्य केलेल्या सर्व सूचनांचे उल्लंघन होते. आपल्या मनातील भावनांकडे दुर्लक्ष करणे नव्वद टक्के आपणास जमते परंतु त्याचे कारण आपली साधनेतील प्रगती नसून मनामध्ये अजून हट्ट निर्माण झालेला नसतो हे असते. जेव्हा उरलेल्या दहा टक्क्यांमध्ये मनात कुठलीतरी आत्यंतिक इच्छा निर्माण होते तेव्हा आपण त्याच्या हट्टापुढे हात टेकतो.
अशा दृष्टीने बघितल्यास पारमार्थिक जीवनाच्या परीक्षेत आपण जास्तीत जास्त नव्वद टक्के गुण मिळवितो असे आपण म्हणू शकतो. आणि या परीक्षेची गंमत अशी असते की एकतर तुम्ही शंभर टक्के मार्क कमावून पास होता वा संपूर्ण नापास होता! भगवद्गीतेच्या तेराव्या अध्यायामध्ये ज्ञानी माणसाची लक्षणे सांगून झाल्यावर भगवान म्हणतात ‘अज्ञानम् यदतो अन्यथा (गीता ११:१३)’ असे म्हणत. याचा अर्थ असा होतो की जे ज्ञान नाही ते अज्ञान आहे. इथे तुम्ही पंचवीस टक्के ज्ञानी झालात किंवा आता जवळ-जवळ संपूर्ण ज्ञानी झाला आहात असे कुठेही म्हटलेले नाही. जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत अज्ञान असते आणि अचानक दिवा लावल्यासारखे आपण संपूर्ण ज्ञानी होतो असे इथे अध्यारुत आहे. व्यावहारीक जीवनात अशी टोकाची भूमिका कधीच दृष्टीपत्त्यास पडत नसल्याने आपण आपल्या नव्वद टक्क्यांवरच खूश राहतो. त्या नवद टक्क्यांचे शंभर टक्के करणे अपरीहार्य आहे हे आपणास कळत नाही. कर्मयोगाद्वारे आपण अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशात येण्याचा प्रयत्न करु शकत असल्याने भगवान अर्जुनाला कर्मयोग संपूर्णपणे विषद करुन सांगणार आहेत. ते कसे हे आपण पुढे बघूच!
॥ हरिः ॐ ॥