॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्गुरु माधवनाथाय नमः ॥
तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर ।
असक्तो ह्याचरन्कर्म परमाप्नोति पूरुषः ॥ गीता १९:३ ॥
भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला कौरवांशी युध्द करणे श्रेयस्कर कसे आहे हे पटवून देण्यास सुरुवात केली. तेव्हा बोलता बोलता विषय निघाला म्हणून त्यांनी स्थितप्रज्ञ माणसाची लक्षणे सांगितली. त्यातील अंतिम श्लोकात, म्हणजे द्वितीय अध्यायाच्या समाप्तीच्या श्लोकात, ब्रह्मस्थिती प्राप्त झाली की सर्व कामना नष्ट होऊन ब्रह्मस्थितीमध्ये साधक निरंतर स्थिर रहातो असे सांगितले. तेव्हा अर्जुनाच्या मनात असा संदेह उत्पन्न झाला की मनातून सर्व कामना नष्ट करायच्या आहेत ही अंतिम स्थिती असेल तर मी कर्म न करणेच श्रेष्ठ होय. कारण वासना असल्याशिवाय आपल्या हातून कर्मे घडत नाहीत. तेव्हा वासनांचा क्षय होणे म्हणजे कर्मांचा नाश होणे होय. मग मी युध्दाला का सुरुवात करु?
अर्जुनाच्या मनात अशी शंका निर्माण झाली तरी त्याची सारासार विचार करण्याची बुध्दी संपूर्णपणे गेली नसल्याने त्याने आततायीपणा न करीता भगवान श्रीकृष्णांनाच आपल्या संदेहाचे निराकरण करण्याची विनंती केली. त्यामुळे गीतेच्या तृतीय अध्यायाची सुरुवात अर्जुनाच्या प्रश्नाने होते ‘कर्म करण्यापेक्षा बुध्दीयोग श्रेष्ठ आहे तर मला युध्द करण्याच्या कर्मात का लोटतोस हे मला पटेल अशा शब्दात सांग’. त्याच्या मनातील शंकेचे निवारण करण्यास भगवंतानी त्याला कर्मयोग सांगितला आणि म्हटले की परमार्थाची अंतिम स्थिती गाठण्यासाठी अनेक मार्ग आहेत त्यातील कर्मयोग हाच मार्ग तुझ्यासाठी श्रेयस्कर आहे. दुसऱ्या एकाने संन्यास घेऊन कर्मांचा त्याग करुन भगवंताशी जवळीक साधली म्हणून तू तसे वागायचा प्रयत्न केलास तर ती एक घोडचुक ठरेल. आज अध्ययनाला घेतलेल्या वरील श्लोकात भगवान म्हणत आहेत: ‘ तू कर्मफळाची आसक्ती न ठेवता कर्म कर. आसक्ती सोडून योग्य कर्म करणाऱ्याला मोक्षच प्राप्त होतो (म्हणजे परमार्थातील अंतिम स्थिती त्याला अप्राप्य नसते. म्हणजे जी गोष्ट बुध्दीयोगाने मिळते तीच कर्मयोगानेही प्राप्त होते.).’
भगवंतांच्या या उच्चारांवर विचार करण्याआधी आपण अर्जुनाच्या मनातील संदेहाकडे बघू. सर्वसाधारणपणे आपली अशी खात्री असते की आपल्या मनात कर्माबद्दल जेव्हढी ओढ असते तेव्हढे चांगले कर्म आपल्या हातून होते. त्यामुळे अर्जुनाप्रमाणेच आपल्या मनात अशी शंका असते की ‘कर्म तटस्थपणे करायची, तर ती चांगली होतील याची खात्री काय? केवळ करायची म्हणून केलेली कर्मे आपणास भगवंताजवळ कशी नेतील?’ आपणास असे वाटते की वासनारहित झालो तर आपण रस्त्यावरच्या दगडासारखे निर्बुध्द, निर्विकार आणि निरुपयोगी होऊ. आपल्या मनातील ही भिती आपणास अध्यात्माच्या मार्गावर झोकून देण्यास प्रतिबंध करते. परंतु आपली ही भिती लहान मुलाच्या मनातील ‘बागुलबुवा’च्या भयासारखी आहे. अंधाऱ्या, रिकाम्या खोलीत बागुलबुवा आहे म्हणून तिथे न जाणाऱ्या मुलाने स्वतः तिथे जाऊन कधी त्या भयानक राक्षसाला बघितलेले नसते त्याचप्रमाणे आपण वासनारहित मानवाला कधी बघितले नसल्याने आपली भिती निव्वळ आपल्या कल्पनेवर आधारित आहे. या भयाचे निराकरण स्वतः वासनाविरहीत झालेल्या मानवाला बघणे यात आहे, म्हणजेच संतसंगतीत आहे. म्हणूनच परमार्थात सत्संगतीला अनन्यसाधारण महत्व आहे. अर्जुनाचे भाग्य थोर होते की भगवान श्रीकृष्णांचा सहवास त्याला त्याच्या जीवनातील आणिबाणीच्या क्षणी मिळाला आणि त्याने त्याचा संपूर्ण फायदा उठविला. असो. कामनाविरहीत झाल्यावरसुध्दा आपल्या हातून उपयुक्त कर्मे कशी होतील या आपल्या संदेहाचे निराकरण करायचे असेल तर कर्म होत असताना नक्की काय होते हे आपण बघितले पाहिजे.
जेव्हा आपण प्रत्यक्ष कर्म करीत असतो तेव्हा आपल्या मनातील सर्व भावनांचा नाश झालेला असतो. कर्म सुरु करायच्या आधी आपल्या मनातील आलस्याचा नाश करण्यासाठी ज्या शक्तीचा आधार आपण घेतो ती शक्ती म्हणजे आपली वासना होय. परंतु एकदा कर्म सुरु झाले की आपली वासना एक अडथळाच होतो. एखादी गोष्ट करणे आपल्याकरीता महत्वपूर्ण आहे याची जाणीव ती गोष्ट करीत असताना सतत जागृत असेल तर आपले हात-पाय गळून जायची शक्यताच जास्त असते. जेव्हा एखादी क्रिकेट टीम विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याची तयारी करीत असते, तेव्हा त्यांना असे वारंवार बजावण्यात येते की उद्याचा सामना बाकी एखाद्या सामन्यासारखाच आहे असा विचार करा. हा सामना जिंकला की विश्वकरंडक हाती येणार ह्याची सतत जाणीव मॅच खेळताना ठेवली तर खेळाडू नीट खेळू शकत नाही. एखादी चूक झाली तर भयानक परीणाम भोगावे लागतील याचे सतत स्मरण ती चूक आपल्या हातून घडण्यास कारणीभूत होते. म्हणून अत्यंत महत्वाच्या सामन्यात सर्व झेल पकडले जातात असे नाही आणि श्रीसांथने टी२०च्या अंतिम सामन्यातील सर्वात मोक्याच्या क्षणी पकडलेला मिसबाह उल हकचा सोपा झेलही खूप कौतुकास्पद होतो. तो झेल कठीण नव्हता तर तो झेल महत्वाचा होता याची जाणीव असूनही त्याने तो पकडला हे कौतुकास्पद होते. दुसरे उदाहरण म्हणजे कितीही नावाजलेला डॉक्टर असला तरी आपल्या जवळच्या नातेवाइकावरील शस्त्रक्रिया तो स्वतः करीत नाही. आपल्या हाताखालील रुग्ण बरा केलाच पाहिजे याचे बंधन त्याच्यावर इतके पडते की त्याचे हात नेहमीप्रमाणे चालतील याची खात्री तो देऊ शकत नाही. तेव्हा सांगायची गोष्ट अशी की जेव्हा कर्मे करण्यातच आपण संपूर्ण गुंगून जातो तेव्हाच आपल्या हातून उत्तम रीतीने कर्मे होतात. म्हणजे, जेव्हा कर्म घडत असते तेव्हा त्या कर्मामुळे आपणास काय मिळणार आहे, किंवा मी हे कर्म का सुरु केले आहे इत्यादी विचारांपासून आपणास मुक्तता मिळाली तरच कर्म व्यवस्थित पार पडते.
म्हणजे काय तर वासना मनात जागृत असेल तर त्यामुळे कर्मे सुरु होतात पण हातातील कर्मे उत्तम रितीने पार पाडायची असतील तर त्या वासना विसरुन हातातील कर्मांमध्येच संपूर्ण विसरुन जाणे जरुरी आहे. त्यामुळे कर्मफळाची वासना नष्ट झाल्यावर उत्तम रितीने कर्म कसे पार पडेल ही आपली भिती निरर्थक आहे. ज्याप्रमाणे बागुलबुवाला अस्तित्वच नसते त्याचप्रमाणे आपल्या या भयाला वास्तवामध्ये पायाच नाही. लक्षात ठेवा की कर्मफळाच्या वासनेने आपण जास्तीत जास्त कर्माला सुरुवात करु शकतो, आणि कर्म करण्यात कंटाळा आला तर परत ते रेटू शकतो. फळांच्या इच्छेने बाकी काही होत नाही. तेव्हा कर्म सुरु करायचे आहे अशी आपली खात्री असेल आणि कर्म संपेपर्यंत सोडायचे नाही असा निर्धार असेल तर कर्मफलाच्या वासना ठेवणे आवश्यक तर नाहीच उलट धोक्याचे आहे.
कर्मफलासक्ती ठेवणे धोक्याचे आहे कारण कर्मफळाच्या वासनेचे दुष्परीणाम अनंत आहेत. जेव्हा एखादे फळ मनात ठेवून आपण कर्माची सुरुवात करतो तेव्हा अगदी मनासारखेच फळ मिळाल्याशिवाय समाधान होत नाही. उदाहरणार्थ, समुद्रकिनाऱ्यावर सहलीला जाताना तेथील सूर्यप्रकाशात नाहून निघायची कामना करणाऱ्यांना, तिथे गेल्यावर ढगाळ वातावरण आढळले तर निराशा पदरात येते. ढगाळ हवेतील सौंदर्य त्यांना दिसतच नाही. याउलट नेहमीच्या वातावरणापेक्षा निराळ्या जागी जावे अशी अपेक्षा ठेवणाऱ्यांना ढगाळ हवेबद्दल दुःख होत नाही. मनात जेव्हढी कामना प्रबळ असते तेव्हढे सुख कमी असते आणि ताण जास्त असतो. मानसिक तणावाचे मूळ कारण आपल्या मनातील अपेक्षा आहेत, दुसरे काही नाही.
या विवेचनावरुन असे सिध्द होते की कर्मे चांगली व्हावीत याकरीता कर्मफळाची वासना काढणे आवश्यक आहे आणि झालेल्या कर्मातून सुख मिळविण्याकरीता मनात एखादी ठराविक अपेक्षा नसणे जरुरी आहे. मनात आसक्ती ठेवण्याकरीता जी कारणे आपण पुढे करतो त्यापैकी फक्त एकच कारण संयुक्तिक वाटत आहे. ते म्हणजे, आसक्ती नसेल तर कर्मे सुरु कशी होतील?
या कारणाचे निराकरण करण्यास धर्म लिहिला आहे! फलासक्तीमुळे कर्म सुरु न करीता हे कर्म करणे माझा धर्म आहे म्हणून आपण सुरु करु शकतो. धर्मपालन करणे ही गोष्ट आसक्तीला पर्याय आहे. म्हणून श्री ज्ञानेश्वर महाराज वरील श्लोकावर विवेचन करीत असताना असे म्हणत आहेत:
म्हणऊनि तूं नियत । सकळ कामनारहित ।
होऊनिया उचित । स्वधर्मे राहाटें ॥ १५०:३ ॥
जे स्वधर्मे निष्कामतां । अनुसरले पार्था ।
ते कैवल्यपद तत्वता । पावलें जगीं ॥ १५१:३ ॥
भगवान अर्जुनाला म्हणाले की कर्मफळाची आसक्ती सोडून कर्मे कर आणि त्यावर माऊली म्हणत आहे ‘स्वतःला (धर्माच्या) नियमात बांधून आणि सर्व कामनांचा त्याग करुन आपल्या स्वधर्माचे पालन कर. जी माणसे कामनाविरहीत होऊन स्वधर्म पाळतात त्यांना कैवल्यपदाची प्राप्ती झालेली या जगात दिसून येते.’ श्रीज्ञानेश्वर महाराजांनी ‘स्वधर्म’ हा शब्द भगवंतांच्या ‘कर्म’ या शब्दाचे स्पष्टीकरण म्हणून वापरला आहे. बाकी श्लोकातील अर्थात आणि माऊलींच्या शब्दांत काही फरक नाही. परंतु या इतक्या छोट्या बदलाने अर्थात किती मूलभूत फरक पडला आहे हे वरील विवेचनाने सिध्द होते. खरोखर, महाराजांच्या सूक्ष्म आणि व्यापक प्रतिभेचे वर्णन कोण करु शकणार?
आता शेवटी वासनाविरहीत होणे म्हणजे काय यावर विचार करु.
एखादे कर्म करीत असताना ते भगवंताने आपल्यापुढे आणले आहे म्हणून आपण करीत आहोत ही भावना जागृत होणे म्हणजे त्या कर्माच्या फळाच्या आसक्तीपासून सुटका होणे होय. एकदा ही भावना जागृत झाली की त्यातून मला काय मिळेल हा विचार नाहीसा होतो. परंतु इथेही एक गोम आहे. आपल्यापैकी अनेकजणांना समोर आलेले कर्म भगवंताची इच्छा आहे असे मानण्याची सवय असते. परंतु त्यांना स्थितप्रज्ञ झालेले आपण बघत नाही. याचे कारण असे की त्यांनी ही गोष्ट ‘मानलेली’ असते. खरा परमार्थ मानून-सवरुन होत नाही. उदाहरणार्थ, जीवनात सर्व होते ते चांगल्याकरीताच होते असे आपण मानतो परंतु त्याने कुठल्याही गोष्टीतील आनंद दिसत नाही. कशावरुन घडलेली घटना चांगली आहे हा विकल्प मनात येतोच आणि तो येणे योग्यच आहे. कारण, घडलेली घटना माझ्याकरीता चांगली आहे हे आपल्याला ‘हा सूर्य आणि हा जयद्रथ’ यासारखी स्पष्ट दिसलेली नसते. आपण ती नुसती मानलेली असते. तेव्हा समोर आलेली कर्मे भगवंताच्या इच्छेने आलेली आहेत असे मानणे आपणास तात्पुरती शांती देते. परंतु काही काळाने ‘माझ्या हातून इतकी सत्कर्मे घडली आहेत तरी माझे जीवन इतरांसारखेच सर्वसाधारण का?’ हा प्रश्न उद्भवतोच.
हा जरा सूक्ष्म मुद्दा आहे. सांगायचे असे आहे की कर्मे करीत असताना योग्य मनोभूमिका असणे जरूरीचे आहेच पण कर्म पार पडल्यावर आपल्या कष्टांचे भान विसरणेही मोक्षपदाला योग्य होण्यास जरुरी आहे. भूतकाळातील स्वकर्माची पावती कुणीतरी आपणास द्यावी ही भावनाही आपणास कर्मफळाच्या वासनेत गुंतविते आणि सत्संगतीपासून दूर करते. तेव्हा निष्काम कर्म करण्याची खुबी १. ‘कर्म करीत असताना भगवंताचे स्मरण ठेवणे’ आणि २. ‘झालेली कर्मे विसरुन जाणे’ यात आहे. नुसते सद्यपरीस्थितीत निष्काम होऊन चालणार नाही. भूतकाळातील स्वकर्मांचे पडिसाद जेव्हा वर्तमानकाळात ऐकू येतात तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष करणेही कामनाविरहित होण्यास आवश्यक आहे. सर्व संतांच्या जीवनात बघितले तर असे आढळून येते की त्यांना स्वतःच्या फायद्याकरीता वापरणारी माणसे त्यांच्यासमोर आली तरी त्यांचे अशा स्वार्थी माणसांशी वर्तन पूर्वीप्रमाणेच दयार्द्र असते. पूर्वी आपण या माणसाकरीता कष्ट केले त्याबद्दलचा हिशेब ते मागत नाहीत. भूतकाळातील कर्मांपासून ते आत्ता नफा काढत बसायच्या फंदात ते पडत नाहीत.आपणास निष्काम कर्म करायचे असेल तर अशा थोर संतांच्या दररोजच्या जीवनातील वर्तनाचा आदर्श आपण सतत आपल्यासमोर ठेवला पाहिजे. नाहीतर आजूबाजूची माणसे आपणास त्यांच्या पातळीवर आणून ठेवतीलच यात शंका नाही.
॥ हरि ॐ ॥
(बंगलोर, दिनांक २३ ऑगस्ट २००९)
Shreedhar यांनी पोस्ट केले