306/9: Correct Attitude for Satkarma

ऑगस्ट 12, 2009

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

 

आंधळेया गरुडाचे पांख आहाती । ते कवणा उपेगा जाती ।

तैसे सत्कर्माचे उपखे ठाती । ज्ञानेंवीण ॥ ३०६:९ ॥

 

भगवद्गीतेमधील नवव्या अध्यायावर ज्ञानेश्वर महाराजांचे अतिशय प्रेम होते. नववा अध्याय म्हणतच त्यांनी संजीवन समाधी घेतली असे म्हणतात. त्या अध्यायातील वरील ओवीत ज्ञानेश्वर महाराज अत्यंत मार्मिकपणे म्हणत आहेत ‘आंधळ्या गरुडाचे पंख कितीही सक्षम असले तरी संपूर्णतः निरुपयोगी असतात, त्याचप्रमाणे ज्ञानचक्षू प्राप्त केल्याशिवाय केलेली सत्कर्मे आयुष्यात निष्फळ ठरतात.’ निव्वळ सत्कर्मे करीत रहाण्यापेक्षा, कुठलेही कर्म करण्यामागील हेतू महत्वाचा असतो असे महाराज म्हणत आहेत. आज ह्या ओवीतून आपणास अजून काय संदेश मिळत आहे हे पाहण्याचा प्रयत्न करु.

 

निष्फळतेची व्याख्या

 

सत्कर्मे निष्फळ होत असतील तर जीवनात चांगली वर्तणुक ठेवण्याचा आपला अट्‍टाहास चुकीचा आहे का? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी इथे माउलींना फलश्रुती या शब्दाचा कुठला अर्थ अभिप्रेत आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. भगवंतप्राप्ती हेच एकमेव ध्येय समोर ठेवून ज्ञानेश्वर महाराज आपले जीवन जगले. त्यांचे कुठलेही अभंग बघितले, वा हरिपाठ वाचला किंवा ज्ञानेश्वरीतील आत्मरुपी भगवंताच्या प्राप्तीची ओढ बघितली की ही बाब प्रकर्षाने जाणविते. प्रत्येकजण आपल्या ध्येयाप्रमाणे फलप्राप्तीची व्याख्या करत असतो. तेव्हा माउलींच्या ‘निष्फळ’ या शब्दाची व्याख्या भगवंतापासून दूर होणे हीच असणार यात संदेह नाही. ह्या व्याख्येला पुष्टी म्हणून जर तुम्ही ज्ञानेश्वरीतील पुढील ओव्या वाचल्या तर असे स्पष्ट दिसून येईल की पुण्यकर्मे करुन स्वर्गप्राप्तीची इच्छा धरणाऱ्या लोकांबद्दल माउलींना आत्मीयता नाही. ते म्हणतात

 

मज येता पै सुभटा । या द्विविधा गा अव्हाटा ।

स्वर्गु नरकु या वाटा । चोरांचिया ॥ ३१५:९ ॥

स्वर्गा पुण्यात्मके पापे येइजे । पापात्मके पापे नरका जाइजे ।

मग माते जेणे पाविजे । ते शुध्द पुण्य ॥ ३१६:९ ॥

 

म्हणजे ‘ माझ्याकडे येण्यास स्वर्गलोक आणि नरकलोक हे दोन रस्ते चुकीचे आहेत. पुण्याचे आवरण घेतलेल्या पापाने तुम्ही स्वर्गात घुसता आणि आतून बाहेरुन पाप केल्याने नरकात जाता. ज्या कृतीने माझी प्राप्ती होती होते तेच शुध्द पुण्य होय.’ त्यामुळे सत्कर्मे केल्याने कुठलेही फळ मिळत नाही असे माउलींना म्हणायचे नाही. स्वर्गाचे दार तुम्हाला सत्कर्मरुपी किल्लीनेच उघडायचे आहे. परंतु ते महाद्वार उघडणे चुकीचे आहे अशी खात्री ज्या संतांची आहे त्यांना सत्कर्माबद्दल आत्मीयता वाटणार नाही हे स्पष्ट आहे. याचा अर्थ तुम्ही जाणूनबजून दुष्कर्मे करावित असा लावू नका. नरकात जाणेसुध्दा महाराजांना मंजूर नाही हे विसरु नका! असे समजा की संतांचा त्यांच्या हातून फक्‍त सत्कर्मेच घडावित असा हट्‍ट कधीच नसतो. ‘सहज’ जीवन जगत असताना ज्या क्रिया त्यांच्यामार्फत होतात त्या सर्वांबद्दल त्यांना एकसारखीच आत्मीयता असते. याचे पराकोटीचे उदाहरण म्हणजे श्रीसंत गोरा कुंभारांच्या पायतळी त्यांचा रांगता बाळ तुडविला जाणे होय. या दुष्क्रियेने त्यांना दुःख झाले तरी ती भगवंताची इच्छा असणार यात त्यांना संदेह नव्हता. स्वतःचे हे कर्मदेखील त्यांनी सहज स्वीकारले आणि त्या क्रियेच्या परीणामांना ते सहज सामोरे गेले हे सर्वश्रुत आहे.

 

आपल्या जीवनातील सत्कर्मे

 

साधनेचा मार्ग शोधताना आपण संतांची मदत घेतो. ज्या महामानवाने स्वतः भगवंताची प्राप्ती करुन घेतली आहे त्याच्या पायाशी बसून आपण शिकावे ही भावना आपल्या मनात असते. परंतु साधनेच्या दृष्टीकोनातून संतसाहित्याकडे, म्हणजे त्यांच्या उपदेशाकडे, बघितल्यास असे दिसते की ‘जेव्हढे संत तेव्हढे पंथ’. नाथसंप्रदायात ध्यानाला महत्व दिले आहे तर भक्‍तीसंप्रदायात नामस्मरणाला. याहून योगमार्ग वेगळा आहेच, विवेकाने ‘नेति,नेति’ म्हणणारे आहेत आणि ‘काही करु नका, नुसते स्वतःकडे बघत रहा’ असे सांगणारे संतही आहेत. आपण जितके जास्त वाचन करतो तितके जास्त गोंधळून जातो! त्यात आणि कुणावर विश्वास टाकावा अशी आपली वृत्ती नसते. आपण आयुष्यभर घेतलेल्या पाश्चिमात्य शिक्षण पध्दतीमुळे आपल्या मनाची ठेवण ‘गोष्ट व्यवस्थित पडताळून बघून मगच विश्वास ठेवावा’ अशी झालेली असते. त्यामुळे साध्याभोळ्या खेडवळ माणसांची जी सरळ सहज श्रध्दा असते तीला आपण मुकलेले असतो. आपल्या संशयी वृत्तीचा फायदा व्यावहारिक जीवनात झाला असल्याने ‘बाप दाखव नाहीतर श्राध्द कर’ ही वृत्ती आपल्या हाडीमांसी भिनलेली असते. त्यामुळे कुठल्या संतावर विश्वास टाकावा हे आपणास कळत नाही. याशिवाय दररोजच्या जीवनात भगवंत आपल्याबरोबर असलाच पाहिजे याची जाणीवही आपल्याला नसते. याचा परीणाम असा होतो की आपण अध्यात्म म्हणजे आहे तरी काय हे बघायचा अत्यंत प्रामाणिक प्रयत्न केला तरी आपणास नक्की काय करावे हे कळत नाही आणि अधिक शक्‍ती खर्च करण्यास कारण मिळत नाही. मग आपण सेवानिवृत्तीनंतर बघू अशी टाळाटाळ करतो आणि नेहमीच्या जीवनात परत गुरफटतो किंवा फारतर आपल्या संपर्कात आलेल्या माणसांना मदत करण्यात धन्यता मानू लागतो. परदेशी संस्कृतीच्या प्रभावाखाली नसणारे तरुणही स्वतःच्या आत्मोन्नतीपेक्षा समाजसेवा करण्यातच जीवनाची सार्थकता मानतात याचे प्रमुख कारण त्यांच्या मनातील हा गोंधळ आहे असे वाटते. असो.

तेव्हा नेहमीच्या जीवनापेक्षा अधिक सुसंस्कृत, व्यापक आणि सुंदर जीवन जगण्याचा प्रामाणिक प्रयत्‍न करणाऱ्या साधकाच्या मनाची स्थिती अशी होते: ‘भगवंत आहे का हे माहित नाही. असला तरी त्याच्याकडे कसे जावे हे कळत नाही. आणि ही सृष्टी त्याचीच लीला आहे असे मानले तर निदान आपल्या कुटुंबियांच्या हिताकरीता वा समाजाच्या उन्नतीकरीता मी आयुष्यभर झटलो तर भगवंताचीच सेवा करण्यासारखे आहे. कदाचित यातच माझ्या जीवनाचा अर्थ आहे.’ आपली ही मनोवृत्ती असताना आपल्या हातून झालेली सर्व सत्कर्मे म्हणजे ज्ञानचक्षूविना झालेली सत्कर्मे होय.

 

ज्ञानाची व्याख्या

 

ज्ञानचक्षू प्राप्त करणे म्हणजे काय हे आता आपण बघू. स्वतःच्या जीवनात भगवंताचे निरंतर सान्निध्य असावे ही भावना अखंड जागृत असणे म्हणजे ज्ञानदृष्टी मिळविणे होय. ही गोष्ट सर्वांना माहित असतेच असे नाही. श्री रामकृष्ण परमहांसांचे सुप्रसिध्द शिष्य ‘एम’ जेव्हा पहिल्यांदा परमहंसांना भेटले तेव्हा स्वतःच्या पत्‍नीबद्दल असे म्हणाले की ‘ती ठीक आहे पण तीला फार ज्ञान नाही.’ तेव्हा लगेच श्रीरामकृष्ण म्हणाले की ‘आणि तुला फार ज्ञान आहे. हो ना!’ एम त्याकाळचे द्विपदवीधर असल्याने त्यांना खरोखर वाटत होते की आपणास काहीतरी कळले आहे! आणि ज्ञानाच्या वर केलेल्या व्याख्येतच मगाशी निर्देश केलेल्या साधकाच्या मनातील गोंधळाचे निरसन आहे. खरी गोष्ट अशी आहे की कुठलीही साधना आपणास भगवंताकडे घेऊन जात नाही. जर साधनेने भगवंत मिळणार असता तर भगवंत साधनेवर अवलंबून आहे असे म्हणायला हवे. म्हणजे साधना त्याच्यापेक्षा श्रेष्ठ ठरते! साधना करुन मिळवायचे काय असते तर भगवंताशिवाय पर्याय नाही ही भावना. संतांनी सांगितलेल्या सर्व साधना या भावनेची ठिणगी आपल्या मनात पाडतात आणि नंतर त्या ठिणगीला निरंतर प्रज्वलित ठेवतात. साधना भिन्न का असतात तर ठिणगीला कसे प्रज्वलित ठेवायचे हे त्या ठिणगीच्या स्थानावर अवलंबून असते. जिथे फार वायू नाही तिथे आपोआप आग जळत रहाते (काही करु नका, नुसते स्वतःकडे बघत रहा असे सांगणारे संत या पातळीवर बोलत असतात). याउलट जिथे संसाररुपी वादळाचे थैमान चालू आहे तिथे ठिणगीला फार जपावे लागते (निरंतर नाम घेत रहा हा उपदेश या पातळीवर असतो). साधकाच्या मनाची जशी अवस्था तशी त्याची साधना! परंतु मुख्य गोष्ट काय आहे? भगवंताच्या सान्निध्याची अनन्य आस्था.

काही प्रसंगाने आपल्या सद्य परिस्थितीबद्दल अनास्था वाटू लागली की आपल्या जीवनात एक पोकळी निर्माण होते आणि ती भरुन काढण्यास आपली साधना सुरु होते. ही अस्वस्थता म्हणजे ठिणगी निर्माण होण्यास उपयुक्‍त स्थिती. म्हणूनच आयुष्यभर श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा घरोबा असला तरी भगवद्गीता अर्जुनाच्या जीवनात पोकळी निर्माण झाल्यावरच सांगितली गेली. आपल्या निराशकाळी भगवान जवळ आहे का नाही यावर आपली पोकळी कशी भरुन निघते हे ठरते. एखादी साधना दृढ ठरवून आयुष्यभर त्या मार्गावर निव्वळ भगवंतप्राप्तीकरीता जाणाऱ्या साधकांजवळ भगवंत प्रत्यक्ष होते असे म्हटले तर चुकीचे होणार नाही. भगवान श्री रमणमहर्षींना अत्यंत लहानपणी अचानक मृत्यूचा झटका बसला (आपण मरण पावलो आहोत असे त्यांना वाटले. त्यांचे शरीर निश्चेष्ट झाले होते पण मन जागृत होते. त्यांना दिसून आले की काही काळ दुःख केल्यावर घरातील सर्व मंडळी आपापल्या व्यवधानाबद्दल विचार करु लागले आहेत आणि त्यांचे नातेवाइकांबद्दल असलेले ममत्व कायमचे गेले) आणि त्यांचे डोळे असे उघडले की त्यांनी घराचा त्याग करुन महर्षीपद प्राप्त करुन घेतले. आता असा अचानक दुःखद प्रसंग फक्‍त त्यांच्याच जीवनात आला असे नाही. आपल्या सर्वांच्या जीवनात येतोच. पण आपल्यातील अस्वस्थता लगेच मिटते आणि आपण परत पूर्वीच्याच जीवनपध्दतीत रममाण होतो. आपल्यामध्ये आणि संतांमध्ये हाच फरक आहे. ते एका धड्यात सर्व शिकतात आणि आपण आयुष्यभर अपेक्षेभंगाचे धडे मिळूनही काही शिकत नाही. आहे त्याच ठिकाणी बसून आजूबाजूला स्वच्छता करायचा प्रयत्‍न करतो परंतु मूळ घाण फार अंतर्यामी आहे हे आपल्या लक्षात येत नाही. म्हणूनच भगवंताची प्राप्ती समाजसेवकांना झाली आहे असे दिसून येत नाही. मनाची अचल शांती त्यांना मिळाली आहे असे होत नाही. माझ्या पश्चात माझे कार्य पुढे कोण चालविणार याची चिंता वा मला पाहिजे तशी समाजमान्यता मिळाली नाही याची खंतच त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात आढळून येते. ही वस्तुस्थिती सत्कर्मांना परमार्थाची जोड नसेल तर ती व्यर्थ आहेत हेच दर्शवित आहेत. म्हणजे काय, तर ‘सत्कर्माचे उपखे ठाती, ज्ञानेंविण.’ आचार्य विनोबा भाव्यांसारखी वा स्वामी विवेकानंदांसारखी परमार्थावर विश्वास ठेवून समाजसेवा करा. निव्वळ समाजसेवा करण्यातच जीवनाची सार्थकता मानू नका. भगवंताचे नामस्मरण निरंतर चालू ठेवा. नाहीतर आयुष्याच्या उत्तरार्धात मनाची समाधानी आणि शांत अवस्था प्राप्त होणे अशक्य आहे असे माउली म्हणत आहे असे वाटते. आणि एकदा मनात ज्ञानाची स्थिरता झाली की तुम्ही जे काय कराल ते शुध्द पुण्यच आहे कारण त्यामुळे तुम्हाला भगवंताचे सान्निध्य निरंतर लाभणार आहे. तेव्हा आपले काम काय असेल तर भगवंताची ओढ सतत आपल्यामध्ये प्रखरतेने जागृत ठेवणे. बाकी सर्व आपोआप होते.

 

॥ हरि ॐ ॥

 

(बंगलोर, १२ जुलै २००९)